‘शिवाजी लोटन पाटील’

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपटांवर छाप होती ती मराठी मुद्रांची. चार राष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरलेला ‘धग’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच गाजत असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा वाढलेली आहे. गावातल्या घाटावर प्रेतांवर उर्वरित अत्यंसंस्कार आणि सेवा करणार्‍या कुटुंबाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेता शिवाजी लोटन पाटील या हुन्नरी दिग्दर्शकाने केवळ मराठीच नव्हे अमराठी प्रेक्षक, माध्यमं आणि चित्रपट सृष्टी या सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ‘शिवाजी लोटन पाटील’ या नावाला आज एक वेगळं वलय प्राप्त झालं आहे. आपल्या ध्येयासाठी जळगाव जिल्ह्यातल्या मांदुर्णे या छोट्याश्या खेड्यातून मायानगरी मुबंईत दाखल झालेल्या शिवाजीचा स्ट्रगल खरोखरीच अंगावर काटा आणणारा आहे. कुठलही आर्थिक आणि शैक्षणिक पाठबळ नसताना केवळ चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारणारा शिवाजी पाटील आज या क्षेत्रात स्ट्रगल करणार्‍या अनेकांसाठी आदर्श ठरला आहे. लहाणपणापासूनच लिहिण्याची, वाचनाची आणि अभिनयाची आवड असणारा शिवाजी गावातील तमाशे आणि लग्नातील गाणी ऎकून गावात, शाळेत छोटी छोटी नाटकं बसवायचा. घरातल्या मंडळींना आदल्या दिवशी तमाशात पाहिलेले प्रसंग हुबेहुब परत करून दाखवायचा.
ध्येयाने पछाडेल्या शिवाजीने मुंबई गाठायची हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. एका छोट्याश्या कंपनीत नोकरी करण्यासाठी शिवाजी मुबंईत दाखल झाला. त्यानंतर शिवाजीने दुधाचा व्यवसाय केला त्यात तोटा झाल्यानंतर प्रसंगी रस्त्यावर कांदे-बटाटे विकून शिवाजीने आपला उदरनिर्वाह चालू ठेवला. एका मित्राच्या मदतीने मालिकेच्या दिग्दर्शकांचा असिस्टंट म्हणून शिवाजीला नोकरी मिळाली आणि इथूनच शिवाजीच्या आयुष्यातील नव्या पर्वाला आरंभ झाला. या काळात शिवाजीने भरपूर वाचन केलं, एडिटींग शिकून घेतलं. शिवाजी सांगतो कि, मला मराठी नीट येत नव्हते. माझी भाषा अहिरणी असल्यामूळे मराठी केवळ शाळेपुरतीच मर्यादित होती. त्यामुळे मराठी सुधारण्यावर भर दिला.

एकीकडे व्यावसायिक स्ट्रगल चालू असतानाच शिवाजीच्या व्यक्तीगत आयुष्यात ही चढ उतार होत होते.
२०१० साली ‘वावटळ’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून शिवाजीला काम मिळालं. वावटळच्या चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी शिवाजीच्या वडिलांचे निधन झाले. शिवाजीला अंत्यविधीलाही जाता आलं नाही. शूटिंग दरम्यान शिवाजीच्या पत्नीला कॅन्सर असल्याचं निदान झालं आणि चित्रपटाच्या प्रिमीयरच्या दिवशीच पत्नीचं निधन झालं. पण या संघर्षाने शिवाजी कधीच डगमला नाही. ‘नाही जमलं तर नाही ही काय आपल्या बापाची लाईन हाय काय’ या अस्सल रांगडी आत्मविश्वासानेच धग ची राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटली. साधं सरळ व्यक्तीमत्व आणि भाषेतला ग्रामीण लहेजा या शिवाजीच्या वैशिष्ट्यामुळे सामान्य माणसांना तो आपल्यातलाच एक वाटतो

Comments

Popular posts from this blog

R.K. Builders and developers chiplun

vrukshavalli agro tourism chiplun

Vrukshavalli Agro Tourism Chiplun